Monday, 8 May 2017

भाव तरंग-कळतं पण वळत मात्र नाही.

         सुख दुःख क्षणिक असतं.दोन्हीही मनाच्या धारणाअसतात.जी घटना आपल्याला सुखदायक वाटते ती दुसऱ्याला नेमकी दुःख दायक वाटते.त्यामुळे सुखाविषयी प्रत्येका-
च्या संकल्पना वेगवेगळ्या असू शकतात.
          सुख दुःखाचा संबंध मनोकल्पित असतो.आज सुखदायक असलेली घटना नेहमीच
सुखकारक असेल असे नसते.माणसाचे कौटुंबिक संबंध,त्याच्या इच्छा,आकांक्षा,इतरांकडू-
न अपेक्षा,सांपत्तिक स्थिती,शारीरिक स्वास्थ्य,महत्वाकांक्षा या साऱ्या साऱ्यांचा संबंध
कृतीशी येतो व कृतीचं फलित सुख वा दुःखदायक असतं.कृती ही बाह्य वा आंतरिक
व्यवस्थेवर अवलंबून असते.ठरवलं तसं क्वचितच घडतं व अपेक्षेप्रमाणे यश अपयश मिळतं.
          यश मिळताच मन उल्हसित होतं.आनंदित होतं.अपयश येताच निराश व दुःखी होतं.
अर्थात ही अवस्था परिवर्तनीय असते.पण मन मात्र खंत करीत बसतं दुःखात खंत व सुखात
ही अवस्था अशीच टिकून राहील वा नाही या विषयी चिंता.दोन्हीही गोष्टी अहितकारक.
             सुख दुःखात मनाचा तोल जाता कामा नये.तिथं समता असायला हवी. ती अलिप्त-
तेतूनच प्राप्त होऊ शकते.
               घडणाऱ्या घटनांकडे त्रयस्थ दृष्टीने पाहाता यायला हवं.फक्त कृती कशी केव्हां कितीवेळ करायची एवढंच आपल्या हातात असतं.कृतीचं फलित आपल्या नियंत्रणात नसतं.
                सुख असो वा दुःख दोघांकडे ईश्वरी प्रसाद म्हणून पाहाणारा माणूसच आनंदित
राहू शकतो.कृतीचं फलित आपल्या अपेक्षेप्रमाणेच असायला हवं हा अट्टाहास चुकीचा असतो.
            कळतं सगळ्यांना पण वळत मात्र नाही हीच खरी शोकांतिका असते.

No comments:

Post a Comment